राज्याचा अर्थसंकल्प आज (सोमवारी) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी जलसंपदा आणि सिंचन विभागाबद्दल त्यांनी मोठी घोषणा केली. राज्याच्या सहकार व पणन विभागासाठी १२८४ कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी मंजूर करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली.
राज्यात जलसंपदा विभागाची २७८ कामं सुरू आहेत यातून २६,८८,५७६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून ८,४०० घनमीटर इतका पाणीसाठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत २६ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची उर्वरीत किंमत २१,६९८ कोटी २१ लाख इतकी आहे. सन २०२१-२२ या वर्षात २६ पैकी १३ प्रकल्प पूर्ण करायचे सरकारचे उद्दीष्ट आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
बळीराजा जलसंजीवनी योजने अंतर्गत ९१ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत १५,३२५ कोटी ६५ लाख इतकी आहे. या पैकी १९ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून १,०२,७६९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी १ हजार कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ अखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुर्नस्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत १२ धरणांच्या बळकटीकरणाकरीता ६२४ कोटी रूपये कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे ५००० हेक्टर क्षेत्रात बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देणार, अशी माहिती देण्यात आली.