राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी २ वाजता विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ठाकरे सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी पवार यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. या अर्थसंकल्पात आरोग्य विभाग, कृषी, महिला,एसटी, रेल्वे, जलसंपदा विभाग, एमपीएससी, धरणे, महामार्ग, यांसह विविध प्रकल्पांबाबत मोठ्या घोषणा करतानाच अनेक योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पुण्यात नव्या 8 पदरी रिंगरोड तयार करण्यात येणार आहे. यासाठी 24 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे, नगर, नाशिक असा 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या लोहमार्गासाठी 16139 कोटी मंजूर करण्यात आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी 28 कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच पुण्यातील साखर संकुलात साखर संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, जेजुरी, नीरा नरसिंगपूर यांसह सात पुरातन मंदिरांचा विकास होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड येथील मेट्रो प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात पीककर्ज घेणाऱ्या नियमित वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी 4 वर्षासाठी 2 हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच राज्यात आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद आणि नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. तसेच कोरोनाकाळात राज्यातील अर्थव्यवस्थेला सांभाळण्याचे काम कृषी क्षेत्राने केले असेही त्यांनी सांगितले.