पिंपरी-चिंचवड आणि परिसरात तब्बल २०० कोटी रुपयांच्या जमिनीच्या बळकावणीचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. रामा ग्रुप(एलिफंटा रियल्टी), वर्धमान डेव्हलपर्स, थत्ते कुटुंबातील सदस्य, महेश गाडगीळ यांच्यासह स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे ताथवडे येथील जमिनी बळकावल्या असल्याचा गंभीर आरोप आहे.
🟢 फिर्याद व आरोपी
बाणेर येथील रहिवासी राहुल राजीव अरोरा (वय ५१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा घोटाळा उघड झाला. तब्बल ३६ हेक्टर ४२ आरजमीन बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून बळकावण्याचा कट रचला गेला. या प्रकरणात रामा ग्रुपचे जितेंद्र सुंदरदास पंजाबी, नरेशपंजाबी, राजु पंजाबी, मोती पंजाबी, वर्धमान डेव्हलपर्सचे प्रकाश छाजेड, थत्ते कुटुंबातील किरण थत्ते, उदय थत्ते, महेश गाडगीळ तसेच गुन्हेगारी टोळीतील सदस्यांसह एकूण १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणात फसवणूक, गुन्हेगारी संगनमत, बनावटदस्तावेज निर्मिती व बेकायदेशीर ताबा अशा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🟢 घोटाळ्याची पाळेमुळे
हा प्रकार २०२१ पासून सुरू झाला. आरोपींनी बनावट साठेखतं, खोटी पॉवर ऑफ अॅटर्नी, खोटे सातबारा उतारे तयार करून व्यवहार केले. यामध्ये रामा ग्रुपने थत्ते कुटुंबाशी संगनमत करून तब्बल ९६.२५ कोटींचा बोगस करार केला. तर वर्धमान डेव्हलपर्सने १२.६५कोटींचा खोटा व्यवहार करून आपले नाव जोडले. यातील काही आरोपींना ३५ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देऊन फिर्यादीला धमकावण्यात आले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
🟢 गुन्हेगारी टोळ्या व पोलिस संगनमताचा आरोप
फिर्यादीच्या मते, आरोपींनी स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून दबाव आणला. काही पोलिस अधिकारी यामध्ये थेट सामील असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. उलट तक्रारदारालाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
🟢 फ्लॅट खरेदीदारांचंही नुकसान
या व्यवहारांत बनावट मालकी दाखवून वर्धमान डेव्हलपर्ससोबत करार करण्यात आला. परिणामी प्रकल्पातील फ्लॅट खरेदीदारांचे हित धोक्यात आले आहे. या घोटाळ्यामागे राजकीय आणि पोलिस संरक्षण असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
🟢 एसआयटी चौकशीची मागणी
पीडितांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच रेरा, महसूल विभाग आणि पोलीसविभागाच्या संयुक्त तपासणीची मागणी झाली आहे. हा फक्त एका जमीनमालकाचा प्रश्न नसून संपूर्ण पिंपरी–चिंचवड रिअल इस्टेटबाजारपेठेवरील विश्वासाला तडा देणारा घोटाळा असल्याने सर्वसामान्य जमीनमालकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे.
👉 या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून रिअल इस्टेट माफियांवर लगाम लावण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे


