अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात सध्या एलपीजी (LPG) गॅस टंचाईच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. यामुळे घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी शहराच्या विविध भागात नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील कृष्णानगर आणि फुलेनगर भागातही कडक उन्हात नागरिक गॅससाठी तासनतास उभे असल्याचे चित्र असताना, ‘ कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशन’ ने मदतीचा हात पुढे करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
कडक उन्हात रांगेत उभ्या असलेल्या तहानलेल्या नागरिकांना फाऊंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रगण्य असणाऱ्या कीर्ती मारुती जाधव फाऊंडेशनने या उपक्रमातून पुन्हा एकदा आपली सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली आहे. उन्हाचा तडाखा आणि ताटकळत उभे राहिल्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला.
यावेळी मारुती जाधव, दत्ता धर्मे, अभी जाधव, कृष्णा जाधव, यश अवसरमल, गणेश देवगिरे, धनंजय जाधव यांच्यासह सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. संकटकाळात केवळ चर्चा न करता प्रत्यक्षात नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या या फाऊंडेशनचे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे सध्या शहराच्या सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.


