मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेलने मुंबईतील तीन खटले हिमाचल प्रदेशात ट्रान्सफर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आपल्याला शिवसेना नेत्यांकडून धोका असल्याने ही मागणी कंगना आणि तिच्या बहिणीने याचिकेत केली आहे.
कंगना आणि रंगोली यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे, त्यांच्यावर मुंबईत तीन खटले सुरु आहेत. मात्र आपल्याला शिवसेना नेत्यांकडून धोका आहे. जर मुंबईत या खटल्याची सुनावणी झाली तर भडास काढण्यासाठी शिवसेना नेते टोकाची पावलं उचलू शकते, असं कंगनाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. कंगना आणि तिच्या बहिणीने वकील नीरज शेखर यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात स्थानांतरण याचिका दाखल केली आहे.
मुंबईतील वकील अली कासिफ खान यांनी कंगनाविरोधात एक खटला दाखल केला आहे. तर दुसरा खटला गीतकार जावेद अख्तर यांचा मानहानीचा आहे. तिसऱ्या खटल्यात कास्टिंग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात दाखल केला आहे.