पिंपरी-चिंचवड शहरातील मागील काही दिवसापासून वाढत्या गुन्हेगारीने कहर केल्याने शहर असुरक्षित बनले आहे. जानेवारी ते मार्च या अवघ्या तीन महिन्यांत शहरात १४ खून झाले असून, ६९ बलात्काराचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय लूटमारीच्या ९३ आणि दंग्यांच्या ४० घटना घडल्या आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम खून, खुनाचा प्रयत्न, कोयत्याने वार, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांद्वारे दहशत पसरवणे, भर रस्त्यात अडवून लुटणे, महिलांची छेडछाड या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. या सर्व घटनांमुळे पोलिस यंत्रणेच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकरणाचा वाढता आलेख पाहता येथील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी चार वर्षांपूर्वी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. शहरातील गुन्हेगारी कमी करणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे, शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातवरण निर्माण करून देणे, हा आयुक्तालयामागील मुख्य उद्देश होता.
शिरगाव येथे भरदिवसा सरपंचाचा खून
काही दिवसांपूर्वीच सरपंच प्रवीण गोपाळे यांचा प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरगाव येथील साई मंदिरासमोर खून करण्यात आला. भर वर्दळीच्या ठिकाणी हा खून झाल्याने दहशत पसरली आहे. चिंचवड येथे कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाचा अंगावर कार घालून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फुगेवाडी येथेही कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसाचा टवाळखोरांनी विनयभंग केला. याशिवाय लूटमार, कोयत्याने वार, दोन गटांत भांडणे आणि वाहनांची तोडफोड असे प्रकार सुरूच आहेत.
वाहन तोडफोडीच्या घटना…
शहर आणि परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना ही पोलिसांची नेहमीचीच डोकेदुखी ठरली आहे. मागील काळात या घटना रोखण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र, दरम्यानच्या काळात तोडफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भोसरी, वाकड आणि चिखली परिसरात नुकतीच वाहनांची तोडफोड झाली आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा दहशतीखाली आल्याचे चित्र आहे.प्रतिबंधासाठी प्रयत्नांचा अभाव
चिखली येथे अल्पवयीन मुलीवर बावीस वार करून खून करणारे दोन्ही अल्पवयीन आरोपी पोलिस रेकॉर्डवरील आहेत. शहरातील अनेक गुन्हेगार तुरुंगातून सुटून आल्यानंतर पुन्हा गुन्हे करतात. पोलिस अशा गुन्हेगारांना अटक करून स्वतःची पाठ थोपटून घेतात. मात्र, अशा प्रकारचे गुन्हे घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा काम करताना दिसत नाही.
नाकाबंदीला केराची टोपली
पायी, सायकल, वाहन गस्त; तसेच नाकाबंदीमुळे पोलिसांचा समाजात वावर दिसून येतो. त्यामुळे गुन्हेगारांवर दबाव राहतो. या पार्श्वभूमीवर हद्दीमध्ये अचानक नाकाबंदी करण्याबाबत यापूर्वी वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक पोलिसांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे.
मागील काही वर्षातील गुन्हेगारीचा आढावा
(जानेवारी ते मार्च २०२३)
खून १४
खुनाचा प्रयत्न २२
बलात्कार ६९
लूटमार ९३
दंगा ४०
विनयभंग १२५
गेल्या वर्षभरातील गुन्हेगारीच्या घटना
खून ८०
खुनाचा प्रयत्न ११५
बलात्कार २४३
लूटमार ४६१
दंगा १७३
विनयभंग ४४२
वर्ष २०२१मधील गुन्हेगारीच्या घटना
खून ८५
खुनाचा प्रयत्न १२२
बलात्कार १७१
लूटमार २७२
दंगा १६९
विनयभंग ३५१