राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा झाला. कोरोनाचे सर्व नियम पाळून महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ गौतम भोंग यांनी स्त्री शक्तीचे महत्व संगितले. महाविद्यालयाच्या भोसरी आणि डुडूळगाव या शाखांमध्ये शिक्षण घेण्याचे मुलींचे प्रमाण ७०% आहे. मुलींसाठी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच स्थानिक लोकांसाठी सोयीचे व्हावे म्हणून महाविद्यालयाची २००१ साली स्थापना केली, असे डॉ. गौतम भोंग म्हणाले.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष विलास लांडे उपस्थित होते. यावेळी विलास लांडे यांनी सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महिलांनी कामाचे तास, स्त्री-पुरुष वेतनामधील तफावत, स्त्री-पुरुष समानता अशा स्वतःच्या विविध हक्कासाठी हा लढा दिला होता म्हणून ८ मार्च हा महिला दिन का साजरा केला जातो हे सांगितले. भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार व संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे पाटील आणि पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक विक्रांत दादा लांडे पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश सरांना पुणेरी पगडी, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

या कार्यक्रमानिमित्त आर्यनमॅन मा. श्री. कृष्ण प्रकाश सर पिंपरी – चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्री. कृष्ण प्रकाश सरांनी स्त्री कशी सक्षम आहे ती अबला नाही तर सबला आहे तसेच तिने आर्थिक दृष्ट्या सबल असावे आणि स्वतःला समृद्ध करावे असे विचार अतिशय समर्पक शब्दांत मांडले. त्यांनी ‘खबरदार आदमी’ या स्वरचित कवितेच्या माध्यमांतून आपले बहुमूल्य विचार व्यक्त केले. स्त्री ही पुरुषाची गुलाम नाही तर ती जीवनदात्री, कणखरतेचे प्रतीक आहे. पुरुषाने अहंकारातून बाहेर यावे. स्त्री ही पुरुषाची जीवनदायिनी आहे. तसेच दुसर्या कवितेमध्ये स्त्रीभृण हत्या बंद व्हावी त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे आवाहन केले. बांगलादेशातील प्रसिद्ध अर्थतज्ञ मुहमद युनूस यांचे उदाहरण देऊन, ४८% स्त्रिया बांगलादेशाच्या अर्थकारणात हातभार लावतात याचे कौतुक केले. स्त्रियांनी आर्थिक दृष्ट्या सबल होऊन आर्थिक सत्ता निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून तहसीलदार सौ. गीता गायकवाड लाभल्या. त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. आईच्या मायेने स्वातंत्र्याचा अर्थ समजावून, आजची मुलगी उद्याची सक्षम स्त्री व्हावी म्हणून जबाबदारीने रहा असा मोलाचा सल्ला दिला. स्त्रियांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे .महिलांच्या समस्यांचे पूर्णत: उच्चाटन होण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. तसेच प्रमुख वक्त्या मा. सौ.प्राची दुधाने म्हणाल्या, स्वतःची तुलना दुसर्याशी करू नका. स्त्री – पुरुष एकमेकांना पूरक आहेत. प्राचीन सिंधु संस्कृती ते आधुनिक संस्कृती यांचा थोडक्यात आढावा घेतला. शिक्षित आणि सुसंस्कृत यातील फरक सांगितला. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ‘बी बोल्ड फॉर चेंज’ असा कानमंत्र त्यांनी जाताजाता महिलांना दिला.
सदर कार्याक्रमात मंचक इप्पर, डिसीपी तसेच उपनिरीक्षक पूजा कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मारुतीराव वाघमोडे ( उपाध्यक्ष ), श्री. सुधीर मुंगसे (सचिव), श्री. अजित गव्हाणे (खजिनदार), श्री.विराज लांडे पाटील (युवा नेते), आणि संस्थेचे विश्वस्थ मा. सौ. अश्विनी गोडगे (तलाठी), उद्योजक श्री साळुंके आदि मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पौर्णिमा कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमा प्रसंगी लांडेवाडी आणि डुडूळगाव शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, उप-प्राचार्य, महिला प्राध्यापक, महिला कर्मचारी व विद्यार्थीनीही उपस्थित होत्या.