पिंपरी-चिंचवड महानगर पालिका एक भन्नाट कल्पना राबवणार आहे. पिण्याचे पाणी आणि शितपेयाच्या प्लास्टिक बाटल्या सार्वजनिक ठिकाणी फेकल्या जात असल्याच्या वाढल्यानंतर महापालिकेतर्फे यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आता याच बाटल्या भुकेलेंल्याना नाश्ता देण्याचं काम करणार आहेत. पाच बाटल्यांच्या बदल्यात एक चहा तर दहा बाटल्यांच्या बदल्यात एक वडापाव मिळणार आहे. हा उपक्रम लवकरच सुरू करणार असून यात सहभागी होण्यासाठी छोटे हॉटल्स, किरकोळ विक्रेत्यांनी अर्ज करण्याचे आवाहन महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात शेकडोच्या संख्येने पिण्याचे पाणी आणि शितपेयाच्या वापरलेल्या बाटल्या फेकल्या जातात. यामुळं शहरात अस्वछता होते शिवाय पर्यावरणाची हानी होते अनेकदा रस्त्याच्या कडेला, गटारात या बाटल्या पाहायला मिळतात. क्वचितच जागरुक नागरिकांकडून या बाटल्या उचलून कचराकुंडीत टाकल्या जातात. त्यामुळं महानगर पालिकेकडून बाटल्या द्या आणि चहा आणि वडापाव घ्या असा स्तुत्य उपक्रम राबवला जाणार आहे.
उपक्रम कसा असणार?
कचरा वेचक किंवा इतर नागरिकांनी पाणी आणि शितपेयाच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा केल्यास त्या व्यक्तीला त्याबदल्यात चहा आणि वडापाव दिला जाणार आहे. प्लास्टिकच्या ५ बाटल्यांवर एक चहा तर १० बाटल्यांवर एक वडापाव मिळणार आहे. या बदल्यात महानगर पालिकडेकडून संबंधित हॉटेल, किरकोळ विक्रेत्याला चहासाठी दहा आणि वडापावसाठी पंधरा रुपये मिळणार आहेत.
हॉटेल्स चालक आणि किरकोळ विक्रेत्यांना सहभागी व्हायचे असल्यास?
या उपक्रमात छोटे हॉटेल, हातगाडी, किरकोळ विक्रेते यांना सहभागी व्हायचं असल्यास महानगर पालिकेत अर्ज करायचा आहे. दरम्यान, हॉटेल मालक, विक्रेत्ये (टपरी, हातगाडी) व्यवसायिकाकडे अधिकृत अन्न परवाना, त्या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे. “कचरा गोळा केला जावा, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जनजागृती व्हावी आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” अशी प्रतिक्रिया महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.