चौथ्या कसोटीतही भारताने इंग्लंडचा दारुण पराभव केला आहे. भारताने एक डाव राखून आणि २५ धावांनी इंग्लंडचा पराभव केला. भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीपुढे फिके पडले. दोघांनीही प्रत्येकी पाच विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. या विजयासोबतच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी पात्र झाला आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल यांनी दमदार खेळी करत मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केला. मात्र ४३ धावांवर असताना अक्षर पटेल रन आऊट झाला आणि अर्धशतकाची संधी हुकली. तर दुसरीकडे इशांत आणि सिराज यांच्या विकेटमुळे वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर नाबाद राहिला. ३६५ धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघाने १६० धावांची आघाडी घेतली होती.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताकडे ८९ धावांची आघाडी होती. दरम्यान इंग्लंड संघ चहापानानंतर मैदानात उतरताच अश्विनने क्रॉलीची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर आलेला ब्रेनस्टॉ खातंही उघडू शकला नाही. अश्विनने रोहित शर्माच्या हाती त्याला झेलबाद केलं. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेतली. इंग्लंडची धावसंख्या २० ओव्हर्सनंतर ४० धावांवर ४ बाद अशी झाली होती. यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत विजयाकडे कूच केली. डॅन लॉरेन्स वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही. लॉरेन्सने अर्धशतक आणि जो रुटने केलेल्या ३० धावा या सर्वाधिक धावसंख्या ठरल्या. सहा फलंदाज एक अंकी धावसंख्येवरच तंबूत परतले.