६ मार्च २०२१,
इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ ३६५ धावांवर ऑल आऊट झाला आहे. ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी केलेली जबरदस्त खेळी आणि वॉशिंग्टनच्या फलंदाजीमुळे भारताने १६० धावांची आघाडी घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर नाबाद राहिला, फक्त चार धावांसाठी त्याचं शतक हुकलं. अक्षर पटेल आऊट झाल्यानंतर इशांत शर्मा आणि सिराज यांनी एकामागोमाग एक विकेट गमावल्याने वॉशिंग्टन सुंदर शतक करु शकला नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताकडे ८९ धावांची आघाडी होती.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंजांसमोर विकेट मिळवण्यासाठी आव्हान निर्माण केलं होतं. दोघांनी मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केला. मात्र ४३ धावांवर असताना अक्षर पटेल रन आऊट झाला आणि अर्धशतकाची संधी हुकली. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरकडे मात्र शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे शतकाची संधी पुन्हा एकदा हुकली. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. भारताने एकूण १६० धावांची आघाडी घेतली आहे.
भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने झुंजार खेळी करत भारताचा डाव सावरला. पंतने शतकी खेळी करताना वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने ६ बाद १४६ अशा कठीण अवस्थेतीतील भारताला तारलं. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांसह १०१ धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ७ गडी बाद झाल्यानंतर २९४ धावांसह भारताने सामन्यात आघाडी घेतली होती.
भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात २०५ धावांवर ऑल आऊट केलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपला पात्र होण्यासाठी भाराला हा सामना जिंकणं किंवा ड्रॉ करणं गरजेचं आहे.