करोना आला, त्याने मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं नुकसान केलं, अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेकांना त्रास झाला, काही जण अगदी मरणाच्या दारातून परत आले. करोनाचं भयंकर रुप देशाने पाहिलं. आता या करोनाचं करायचं काय? असा प्रश्न प्रशासनासह सर्वांनाच पडला. काही काळ करोनाशी निःशस्त्र लढल्यानंतर लसीकरणाचं प्रभावी शस्त्र देशाच्या हातात पडलं आणि या शस्त्राने करोनाला हरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या लढाईतला एक मोठा टप्पा देशाने आता पार केला आहे.
देशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला. प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं आहे. पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस! १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल आमच्या देशवासीयांचे अभिनंदन. आमच्या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
मोदी पुढे म्हणाले, त्याच वेळी, आपण सर्व कोविड-१९ संबंधित प्रोटोकॉलचे पालन करत राहू या. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे भारत आभारी आहे. आम्ही आमचे डॉक्टर, शास्त्रज्ञ, नवोदित आणि लोकांचे लसीकरण करणार्या आरोग्य सेवा कर्मचार्यांचे आभार मानतो. मी सर्व पात्र नागरिकांना लस टोचून घेण्याचे आवाहन करतो. चला एकत्र, कोविड-१९ चा सामना करूया.