२ डिसेंबर २०२०,
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३०२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय फलंदाजांना या सामन्यात काही विशेष प्रभाव टाकता आला नाही.
तिसऱ्या वनडेत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण याचा फायदा भारतीय फलंदाजांनी घेतला नाही. या सामन्यात मयांक अग्रवाल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांच्या जागी टी.नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव संघात समावेश शिखर धवनने १६ धावांवर बाद झाला. भारताची पहिली विकेट २६ धावांवर गेली. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण गिल ३३ धावा करून माघारी परतला. गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेला श्रेयस अय्यर पुन्हा मोठी धावसंख्या करू शकला नाही. तो १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल ५ धावांवर माघारी गेला. राहुल बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १२३ अशी होती.
एका पाठोपाठ एक विकेट पडत असताना एका बाजूने विराटने संयमी फलंदाजी सुरू ठेवली होती. या सामन्यात त्याने २३वी धाव पूर्ण करत वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १२ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा ३०० डावात १२ हजार धावांचा विक्रम मोडला. विराटने ही कामगिरी २४२ डावात केली. विराट मोठी खेळी करेल असे वाटत असताना जोश हेजलवुडने त्याला ६३ धावांवर बाद केले. या मालिकेत हेजलवुडने त्याला तिसऱ्यांदा बाद केले.
विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी संघाला ३०२ धावांपर्यंत मजल मारून दिली. हार्दिकने मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. त्यांनी नाबाद १५० धावांची भागिदारी केली. भारताकडून सहाव्या विकेटसाठी झालेली ही तिसऱ्या क्रमांकाची भागिदारी ठरली. हार्दिकने ७६ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ९६ तर रविंद्र जडेजाने ५० चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ६६ धावा केल्या.