पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील सुनेवर बळजबरी करुन मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटाेण्यासाठी 50 हजाराला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा प्रकार अतिशय घृणास्पद असून विकृत मानसिकता असणाऱ्या या आराेपींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. याप्रकरणाची राज्य महिला आयाेगाने दखल घेतल्याची माहिती राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी जागतिक महिला दिवस साजरा केला. मात्र, पुण्यातील घटना बघता अजूनही महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात सुरू असलेला लढा आणखी किती दिवस लढावा लागेल, हा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच पुण्यातील या घटनेबाबत महिला आयोग पाठपुरावा करेन आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. याबरोबरच समाजात अशा प्रकारे घटना घडू नये, यासाठी सातत्याने अनिस आणि इतर संघटनांच्या मदतीने महिला आयोगाकडून जनगागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
नेमकं काय आहे प्रकरण?
काैटुंबिक वादातून 27 वर्षीय पत्नी साेबत अघाेरी कृत्य करुन तसेच तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह सात जणांवर विश्रांतवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाेलीसांनी आराेपींच्या विरुध्द अनैसर्गिक कृत्य, विनयभंग व शारिरिक व मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघाेरी प्रथा जादुटाेणा प्रतिबंध अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. विवाहनंतर पिडित महिला बीड जिल्हयातील एका गावात पतीच्या घरी राहत हाेती. त्यावेळी मासिक पाळी दरम्यान कापसाने तिचे रक्त काढून जादुटाेणा करिता त्याची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.