८ जून २०२१,
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस बरसत आहे. ढगाळ वातावरण आणि बरसणाऱ्या पावसाने परिसरात काळोख दाटला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो जोर पकडणार असल्याचं चिन्हं आहे.
मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर मुंबईच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात ३०० मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत आज सकाळी १० वाजताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, मलाड आणि दहिसरमध्ये काळेकुट्ट ढग दाटून आले, आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. कांदिवली, मलाडमध्ये पावसामुळे रस्त्यावरची दृश्यता कमी झाली, आणि त्यामुळे रस्त्यावर गाड्या धीम्या गतीने जाताना पाहायला मिळाल्या. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरची परिस्थितीही अशीच काहीशी होती.पुढच्या २४ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरमध्येही तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगांनी गर्दी केली आहे. हवामान शास्रज्ञ के एस होसळीकर यांनी याबाबतचं ट्विटही केलं आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यासह पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी दिसते आहे. सध्या मध्य महाराष्ट्र ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर तुफानी पावसाची परिस्थिती तयार झाली आहे.