राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी राज्यात करोनाचे २१७२ नवे रुग्ण आढळल़े असून मुंबईत सर्वाधिक १३७७ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला होता. या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केल्यामुळे जवळपास आठ ते नऊ दिवसांतच राज्यातील करोना रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढील दोन महिन्यात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
विधानसभेत बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, “ओमायक्रॉनच्या संदर्भात १६७ रुग्ण आढळले आहेत. जी काही ६००, ७०० ची रुग्णवाढ होती ती वाढली असून १६०० नवे रुग्ण आढळले आहेत. गती जर अशीच वाढत गेली तर डबलिंग रेट अक्षरश: एक ते दोन दिवसाचा आहे. जर ही संख्या मोठी झाली तर डबलिंग वेगाने होईल आणि जानेवारी-फेब्रुवारीत मोठी संख्या निर्माण होण्याची भीती वाटू शकते”.
करोना रुग्णांकडून जादा पैसे उकळणाऱ्या रुग्णांवर कारवाई
करोना रुग्णांवरील उपचारासाठी राज्य सरकारने जे दर ठरवून दिले होते, त्याऐवजी अवास्तव बिले आकारली जात असतील तर त्याची माहिती दिल्यास संबंधित रुग्णालयांकडून अधिकचे पैसे वसूल केले जातील असं आश्वासन राजेश टोपे यांनी विधानसभेत दिलं. विधानसभेत विरोधी पक्षांच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना राजेश टोपे यांनी करोना केंद्रात गाद्या, औषधे व इतर वस्तूंच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा इन्कार केला, पण त्यासंबंधीचा पुरावा दिल्यास कारवाई केली जाईल असं सांगितलं. करोनाच्या हाताळणीत राज्य सरकारने चांगली कामगिरी केल्याचा दावा राजेश टोपे यांनी यावेळी केला.