१५ जानेवारी २०२०,
चरित्रपटाच्या धर्तीवर निर्मिलेला हा ‘छपाक’ त्या प्रत्येक मुलीची गोष्ट सांगतो, जिची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न त्या ऍसिड हल्ला करणाऱ्यांनी केला. सिनेमाचा विषय आणि त्याची हाताळणी भावनिक असल्यामुळे सिनेमा बघताना काहीसे असाह्य होते. आपण डोळेही मिटून घेऊ. परंतु आपल्याला ती सत्य परिस्थिती बघावी लागेल. तिच्या किंकाळीचा दाह आपल्या समजण्यापलीकडे असला तरी मन घट्ट करून त्या चेहरा जळल्याचे प्रत्येक व्रण बघावे लागतील. कारण, तेव्हाच आपल्याला त्या ऍसिड हल्ला पिढीत मुलीच्या मनाची किंकाळी ऐकू येईल.
‘उन्होंने मेरी सूरत बदली है…मेरा मन नहीं’, हे वाक्य ऐकायला जितकं सरळ आहे तितकंच ते समजून घेणे अवघड आहे. ऍसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील घटनांवर ‘छपाक’ सिनेमाची पटकथा लिहिली गेली आहे. पण, हे लिखाण होताना ‘सत्य घटना’ आणि ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ यांच्यातील रेषा लेखकाने अचूकपणे आखली आहे. सिनेमातील काही प्रसंग मुद्दाम घडवल्यासारखे वाटत असले तरी निम्म्याहून अधिक सिनेमा हा त्याची सत्यता आणि घटनाक्रमाची दाहकता एकसंध पकडून ठेवतो. संपूर्ण सिनेमा हा घटनाक्रमाची साखळी म्हणून आपल्या समोर येतो, त्यामुळे कदाचित काही प्रेक्षकांना तो खटकू शकतो. कारण, मधल्या काळात मसालेदार, मनोरंजनक आणि टाळ्या-शिट्या मारत सिनेमे पाहण्याची सवय प्रेक्षकांची झाली आहे. म्हणूनच अशा मनोरंजनाची अपेक्षा ठेऊन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा नाही. तर समाजातील विकृत बुद्धीला आरसा दाखवणारा हा सिनेमा आहे. अतिका चौहान आणि मेघना गुलजार यांनी सिनेमा लिहिताना त्यातील बारीकबारीक घटनांवर आणि संवादांवर काम केल्याचे प्रकर्षाने दिसते. कारण, साधे आणि सर्वसमावेशक लिखाण करणे हे मसालापट सिनेमांच्या लिखाणापेक्षा अधिक अवघड असते. पण, मेघना गुलजार यांनी त्यांच्या ‘तलवार’ या सिनेमाची केलेली मांडणी आणि ‘छपाक’ची मांडणी एकमेकांच्या विरुद्ध आहे. जो सस्पेन्स ‘राजी’ आणि ‘तलवार’ या सिनेमांच्या पटकथेत शेवटपर्यंत मेघना गुलजार आणि राखला आहे तो, इकडे दिसत नाही. परंतु हीच बाब ‘छपाक’ला इतर सिनेमांपासून वेगळी ठरवते.
तांत्रिक दृष्ट्या सिनेमाची दोन वैशिष्ट्य म्हणजे दीपिका आणि इतर ऍसिड हल्ला ग्रस्त मुलींचा मेकअप आणि सिनेमॅटोग्राफरची नजर. कारण, सत्य घटनेवर आधारित सिनेमा बनवताना त्यातील रिअलिस्टीक टच कायम ठेवण्यात या दोन बाबींचा मोलाचा वाट आहे. सिनेमाची ही खरी गोष्ट २००५ साली पंधरा वर्षाच्या लक्ष्मी अग्रवाल सोबत घडलेली आहे. तिच्याच परिचयाच्या नईम खाननं तिच्यावर हा ऍसिड हल्ला केला होता. या हल्लानंतरचा संघर्ष आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल. सिनेमाची कथा ‘मालती’ (दीपिका पादुकोण) नावाच्या मुलीभोवती फिरते. ही मालतीची गोष्ट नक्कीच बघण्यासारखी आहे. त्यानिमित्त सिनेमात हाताळले वेगवेगळे विषय आणि कथानकाच्या परिपक्कवतेसाठी येणारे इतर सामाजिक मुद्दे देखील दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहे. ऍसिड हल्ल्यात बळी ठरलेल्या मुलींचे भावविश्व चितारताना अनेक महत्वाच्या गोष्टींचा विचार दिग्दर्शकाने केलेला दिसतो. अगदी ३२६ कलमपासून ते ऍसिड विक्री बंदी पर्यंत चहूबाजूंनी पटकथेला पुरेपूर न्याय मेघना गुलजार यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसे यांचे सिनेमातील काम लाजवाब झाले असले तरी काही प्रसंगांमध्ये दीपिकाने आपली भूमिका धरून ठेवलेली नाही. काही प्रसंगांमध्ये दीपिका ही दीपिकाच दिसते. त्यामुळे असेही वाटून जाते की, ‘मालतीची भूमिका इतर कोणत्या तरी अभिनेत्रीने सुद्धा साकारली असती तरी चाललं असतं.’ सिनेमातल्या इतर व्यक्तिरेखाही तितक्याच महत्वाच्या आणि लक्षात राहणाऱ्या आहेत. सिनेमाला संगीत दिलंय शंकर – एहसान – लॉय यांनी आणि सोबतच ‘छपाक’मधला अरिजीत सिंहचा आवाज तुम्हालाही मोहून टाकेल. विशेषत: गुलजार साहेबांनी लिहिलेलं ‘छपाक से’ गाणं मनाला चटका लावणारे आहे. काही बाबींकडे दुर्लक्ष केल्यास एकूणच सिनेमा प्रभावशाली झाला आहे. सिनेमागृहातून बाहेर पडताना तुमच्या कानात ‘तिची किंकाळी’ घुमल्याशिवाय राहणार नाही.
सिनेमा : छपाक
निर्मिती : फॉक्स स्टार स्टुडिओ
दिग्दर्शक : मेघना गुलजार
लेखन : अतिका चौहान, मेघना गुलजार
कलाकार : दीपिका पदुकोण, विक्रांत मेसे
संगीत : शंकर-एहसान-लॉय