Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीअजित गव्हाणे यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला संधी द्या - जयंत पाटील 

अजित गव्हाणे यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला संधी द्या – जयंत पाटील 

गुंडांचा बंदोबस्त चांगलाच जमतो राज्य आम्हीही चालवले- जयंत पाटील 

कोणी दमदाटी, धमकी देत असेल, भीती दाखवत असेल तर त्याला घाबरू नका. तुम्ही काही चिंता करू नका. वीस तारखेचे मतदान आणि 23 नोव्हेंबरची मत मोजणी झाली की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देतो. राज्य आम्हीही चालवले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चिखली घरकुल येथे म्हणाले. पिंपरी चिंचवड शहराच्या वाटण्या करून, शहराची वाट लावणाऱ्यांना अद्दल घडवा.अजित गव्हाणे यांच्यासारख्या एका उमद्या नेतृत्वाला संधी द्या असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेतील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ चिखली घरकुल येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे तसेच माजी नगरसेवक, महाविकास आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. 

जयंत पाटील म्हणाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टीने पिंपरी चिंचवड शहर नावारूपाला आले. शहराचा लौकिक राज्यभर निर्माण झाला.शहर वाढत गेले, शहरातील समस्या देखील वाढत होत्या. मात्र पवार साहेबांच्या दूरदृष्टीने आणि येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कामातून या शहरातल्या समस्या देखील सोडवण्यात आल्या. मात्र गेल्या दहा वर्षात शहराची पुरती वाट लागली आहे. शहराच्या दोन भागात वाटण्या करून या शहराला वाटून खाल्ले आहे. ज्यांना आपण विधानसभेत पाठवले त्यांच्या शरीरात अपप्रवृत्ती शिरली. पैसे कसे मिळवायचे हे त्यांना समजले आणि त्यातूनच शहराचा नावलौकिक मलीन करण्याचे काम केले गेले. 

जयंत पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रात फिरत आहे. महाविकास आघाडीची परिस्थिती खूप चांगली आहे. तुतारीला संपूर्ण राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा असलेल्या उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. स्वाभिमानी भोसरीकर हे काम चोखपणे बजावतील असे देखील जयंत पाटील म्हणाले. गेल्या पाच-दहा वर्षात ज्यांनी चोऱ्यामाऱ्या केल्या त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा नाही. त्यामुळे आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर अजित गव्हाणे यांच्यासारखा प्रामाणिक, आणि उमद्या नेतृत्वाला आपल्याला संधी द्यायला हवी.  असे आवाहन देखील जयंत पाटील यांनी केले. 

तुम्ही महाराष्ट्राची अधोगती केली 

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नातील घसरण जयंत पाटील यांनी अधोरेखित केली. गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्नाची घसरण सुरू आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर ही वाताहत सुरू झाली. गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यात एकेकाळी स्पर्धा होती. मात्र आता गुजरात आपल्या पुढे निघून गेले आणि महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर पोहोचले.  महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील एअरबस, वेदांता- फॉक्सकॉन असे अनेक उद्योग गुजरातला पळविण्यात आले. महाराष्ट्राची अधोगती करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केले असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

भाजपात आता ‘राम’च राहिलेला नाही

गुजरातचे मांडलिकत्व महाराष्ट्राने स्वीकारल्यासारखे काहीजण वागत आहेत. एकीकडे बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे .नांदेडकडे जाणारा जालन्याकडील एक नवा रस्ता केला. त्याचे 11 हजार कोटीचे टेंडर 15 हजार कोटीला दिले. विरारपासून एक नवा रस्ता केला ज्याची कोणीही मागणी केलेली नव्हती . या रस्त्यासाठी 20 हजार कोटीचे टेंडर काढले खर्च मात्र 26 हजार कोटी होत आहे. सरकारी तिजोरीतून पैसे कसे काढायचे असतात हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. समृद्धी महामार्ग केला त्याला तडे गेले. मुंबईला जाणारा अटल सेतू केला त्यालाही तडे गेले. एक काम सरळ नाही. तिकडे लोकसभा बांधली गळायला लागली. राम मंदिर बांधले तर यांचा अयोध्येतच पराभव झाला. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षामध्ये रामच राहिलेला नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments