७ जानेवारी २०२०,
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी,नागरिकत्व सुधारणा कायदा आणि केंद्र सरकारचे विभाजनवादी धोरणाला विरोध करून ’संविधान बचाओ ,राष्ट्र बचाओ ’ संदेश देण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे तत्कालीन वरिष्ठ नेते यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते दिल्ली दरम्यान ’गांधी शांती यात्रा ’ काढण्यात येत आहे . ९ जानेवारी ते ३० जानेवारी २०२० या कालावधीत ही यात्रा जनजागरण करणार असून ९ जानेवारी रोजी ’गांधी शांती यात्रा ’ पुण्यात येणार आहे. राष्ट्र मंच ,फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी,शेतकरी जागर मंच या संस्थांनी गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. गांधी भवनतर्फे गांधी शांती यात्रेचे स्वागत ९जानेवारी संध्याकाळी ५. ३० वाजता गांधी भवनला करण्यात येणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आज पत्रकाद्वारे दिली.
यात्रेचे आगमन साडेपाच वाजता गांधी भवन येथे होणार असून ५. ३० ते ६.३० या वेळेत यशवंत सिन्हा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर तेथेच ते जाहीर सभेद्वारे पुण्यातील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी ,कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या जाहीर सभेस सर्व पुणेकर नागरीकांनी आवर्जून यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यात्रेचा मुक्काम गांधी भवनला असणार आहे ,१० जानेवारी सकाळी ९ वाजता यात्रेचे संगमनेर , नाशिक कडे प्रस्थान होणार आहे . युवक क्रांती दलाचे ( युक्रांद ) कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार आहेत ,असे डॉ कुमार सप्तर्षी यांनी सांगितले. ९ जानेवारी मुंबई ते पुणे ,१०जानेवारी पुणे ते नाशिक ,११ जानेवारी नाशि क ते सुरत ,आणंद ,साबरमती ,राजकोट -पोर बंदर ,उदयपूर -आग्रा -मथुरा -अलिगढ -राजघाट (दिल्ली ) असा या गांधी शांती यात्रेचा कार्यक्रम आहे.