१८ जानेवारी २०२१,
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे. मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत. त्यामुळे चौथी लढत निर्णायक आहे. चौथी कसोटी देखील रंगातदार स्थितीत आहे. पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी ३२४ धावांची तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १० विकेटची गरज आहे. या सामन्याचे तीन निकाल लागू शकतात पण मंगळवारी अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ बिघडू शकतो.
चौथ्या कसोटीत पहिल्या चार दिवसात अनेक वेळा पावसामुळे बराच वेळ वाया गेला आहे. अशात हवामान खात्याने मंगळवारी देखील पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पाचव्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होऊ शकतो, कारण आज (सोमवार) रात्री ब्रिस्बेनमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आज चौथ्या दिवशी पावसामुळे दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावात संपुष्ठात आला आणि भारताला विजायासाठी ३२८ धावांचे लक्ष्य देण्यात आले. टीम इंडियाने दुसऱ्या डावात ४ धावा केल्या आहेत. मालिकेत एडिलेड कसोटीत झालेल्या पराभवानंतर भारताने मेलबर्नमध्ये शानदार विजय मिळवला होता. त्यानंतर सिडनीत भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला सामना जिंकू दिला नाही.
हवामाना विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी एक किंवा दोन वेळा मोठा पाऊस पडू शकतो. दुपारच्या वेळी ढगाळ वातावरण असेल. दिवसभर तापमान २० ते ३० डिग्रीच्या दरम्यान असेल.