३ एप्रिल २०२१,
राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही विरोधकांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा देताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील देशांनी केलेल्या उपाययोजनांचा पाढा वाचला होता. तसंच, जगभरातील देशांनी लॉकडाऊन लावले असले तरी त्यांना आपापल्या जनतेसाठी आर्थिक पॅकेज दिली आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला हाणला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या कार्याला सलाम केला आहे. ते म्हणाले आहेत की, “पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वत:च्या ह्रदयात अनेक स्टेन्स असतानादेखील ज्या पद्दतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत… त्यास सलाम! सलाम!! सलाम… !!!”.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांची २३ मार्चला कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.