दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले याचे सत्य येत्या ७ मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे ७ मार्च रोजीच स्पष्ट होईल, असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर सूचक भाष्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री आणि नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे हेच दिशा सालियन प्रकरणावर वारंवार बोलत होते. आता थेट चंद्रकांत पाटील यांनीच या प्रकरणावर भाष्य केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना हे विधान केलं. दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे, त्याबाबत पाटील यांना विचारण्यात आले असता, याबाबत काहीही राजकारण होत नाही. ७ मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध – पानी का पानी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
त्यांना पळता भूई थोडी होईल….
महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात ७ मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
आघाडी शेतकरी विरोधी…
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केलं. महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल. महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीकडून छळ…
पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले जात आहे. तसेच त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची १९७१ मधील जमिनीची केस काढून पोलिसांनी त्यांचा प्रचंड छळ केला.अखेरीस त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलिसांचा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वापर करण्याचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. आम्ही याच्याविरोधात लढा देऊ. जनताही अशा लोकांना धडा शिकवेल, असंही ते म्हणाले.


