जनसंवाद सभेच्या माध्यमातून नागरिक आणि प्रशासनाचा थेट संवादात्मक समन्वय आल्यामुळे तक्रारींचे तात्काळ निराकरण होण्यास जनसंवाद सभा प्रभावी माध्यम ठरली असून लोकसहभाग, नागरिकांशी सुसंवाद तसेच नागरिकांच्या आशा आकाक्षांचे प्रतिबिंब काल संपन्न झालेल्या जनसंवाद सभेत उमटले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये सुमारे १७० नागरिकांनी तक्रारी आणि सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे २१, २४, ५, १९, १७, १४, ११, आणि ११ नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि जितेंद्र वाघ यांनी जनसंवाद सभेमध्ये नियंत्रित अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. आज प्राप्त झालेल्या काही तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले तर धोरणात्मक बाबींसंदर्भात महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.
अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे उप आयुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, कार्यकारी अभियंता प्रवीण घोडे, रवींद्र पवार यांच्यासह विविध विभागांचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे,उद्यान अधिकारी प्रशांत ताकवले यांच्यासह विविध विभागांचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, शशिकांत मोरे, उद्यान अधिकारी प्रणव ढवळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, यांच्यासह विविध विभागांचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त उमाकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता विकास देसले यांच्यासह विविध विभागांचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते. ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता किशोर महाजन, माणिक चव्हाण, उद्यान अधिकारी शंकर भोकरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश भाट, यांच्यासह विविध विभागांचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, संजय खाबडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार , यांच्यासह विविध विभागांचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव यांच्यासह विविध विभागांचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रशासन अधिकारी आदी उपस्थित होते.
जनसंवाद सभेमध्ये विविध तक्रारी आणि सूचना मांडण्यात आल्या. यामध्ये मालमत्ता मालकी हक्काबाबत भोगवटादार म्हणून नाव असल्याने मालकी हक्क देणे , अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, खंडित विद्युत पुरवठा पुर्ववत करणे, रस्त्यांवरील पथदिवे दुरुस्त करणे आणि नव्याने बसवणे, उच्च दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्ता डांबरीकरण करणे, रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधक आणि दुभाजक बसवणे, ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणे, आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, सार्वजनिक शौचालये उभारणे, भुयारी मार्गांमध्ये सुरक्षारक्षक नेमणे, बेकायदेशीर वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करणे, बंद असलेले जलतरण तलाव सुरु करणे, ओपन जिमची दुरुस्ती करणे, रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे होणारी अडचण दूर करणे, हॉकर्सझोन बाबत निर्णय घेणे, वाढीव पाणी बीलांच्या तक्रारी सोडवणे, कचरा संकलनासाठी छोटे वाहन उपलब्ध करून देणे, नदी प्रदुषण विषयक समस्या, आरोग्य आणि स्वच्छता विषयक समस्या आदी प्रश्न मांडण्यात आले.
नागरिकांनी जनसंवाद उपक्रम राबविल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील तसेच प्रशासनाचे आभार मानले.दरम्यान, आता प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवले जावेत यासाठी जनसंवाद सभेमध्ये प्राप्त तक्रारींवरील कार्यवाहीबाबत आयुक्त राजेश पाटील आढावा घेणार आहेत.