११ मार्च २०२१,
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील नागपुरात दाखल होताच सकाळी विमानतळावरून थेट संघाच्या मुख्यालयात पोहोचले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बंद दरवाजाआड तब्बल दीड तास चर्चा झाली. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी माहिती देण्यात आली नाही. परंतु, मराठा आरक्षणावर त्यांच्यात चर्चा झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान फडणवीसांनी नागपुरात दाखल झाल्यानंतर विमानतळावर अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “अधिवेशनात काहीच फलित नाही, सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
यावेळी त्यांना सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे”.
“करोना वाढत असून सरकारचं त्याकडे लक्ष नाही, त्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. करोना अधिवेशन असतं त्याच्या आधी वाढतो, सुरु असताना कमी होतो आणि संपल्यानंतर पुन्हा वाढतो. सरकारला फक्त अधिवेशन टाळण्यासाठी करोना दिसतो. इतर वेळी दिसत नाही. परिस्थिती भयावह आहे त्यासाठी प्रभावी योजना राबवताना दिसत नाही,” असं फडणवीस म्हणाले आहेत. “हे सरकार शेतकरीविरोधी आहे, गरीबविरोधी आहे हे स्पष्ट झालं आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात तीन महिन्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असताना फडणवीसांनी बोलण्यास नकार दिला आणि त्याबद्दल सुधीरभाऊच सांगू शकतील असं सांगितलं.