इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हेत महत्त्वापूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. देशातल्या 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेला असल्याचे यात सांगण्यात आले आहे. येत्या काळात अजूनही मोठ्या लोकसंख्येवर हा धोका कायम असल्याचं हा अहवाल सांगतोय.
आयसीएमआरने आपला तिसरा सीरो सर्व्हे 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी केला होता. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ICMR चे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं की, 28,589 लोकसंख्येपैकी 21.4 टक्के लोकांमध्ये कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 19.1 टक्क्यांच्या तुलनेत शहरी झोपडपट्टीतील 31.7 टक्के लोकसंख्या आणि 26.2 टक्के इतर लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचं समोर आलं आहे असंही ICMR चे डायरेक्टर जनरल यांनी सांगितलं.
राष्ट्रीय सीरो सर्व्हेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या दरम्यान 21 राज्यांतील 70 जिल्ह्यामधील 700 गावांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. गेल्या तीन आठवड्यात देशातील 47 जिल्ह्यांत कोरोनाची कोणतीही केस समोर आली नाही तर 251 जिल्ह्यांमध्ये कोणताही बळी गेला नाही.
भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून येत्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय.