१२ फेब्रुवारी २०२०,
चीनमधील वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशात साताऱ्यातून चीनच्या वुहानमध्ये लग्न करुन गेलेल्या तरुणीवर अडकून पडायची वेळ आली आहे. अश्विनी पाटील असं या विवाहितेचं नाव आहे.
मागील आठ महिन्यांपासून अश्विनी आणि तिचा पती चीनच्या वुहान शहरात रहात होते. या दरम्यान अश्विनीने व्हिसाच्या कामासाठी पासपोर्ट दिला होता. मात्र तो परत येण्याआधीच वुहान शहर शटडाऊन करण्यात आलं. त्यामुळे अश्विनीचा पासपोर्ट तिला मिळू शकला नाही. याच दरम्यान अश्विनीचा पती आजारी झाला. तिचा पती पोलंडचा आहे. त्याने मायदेशी येऊन उपचार मिळावेत ही विनंती पोलंड सरकारला केली. पोलंड सरकारने विशेष विमान पाठवून अश्विनीच्या पतीलाच मायदेशी नेलं. पासपोर्ट नसल्याने अश्विनीवर वुहानमध्येच अडकून पडण्याची वेळ आली आहे.
वुहानमधून आपली सुटका करण्यात यावी यासाठी अश्विनी पाटील ही भारत सरकारकडे विनंती करते आहे. 23 जानेवारी 2020 पासून वुहान शहर बंद करण्यात आलं. त्यामुळे वुहानमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं नुकसान झालं आहे. अनेकांना तर घराबाहेर पडणंही कठीण होऊन बसलं आहे.
दोन आठवड्यांपूर्वी काही विद्यार्थ्यांना भारतात विशेष विमानाने आणण्यात आलं. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी राज्यमंत्री श्रीनिवास पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता अश्विनी पाटीलला भारतात परत आणण्यासाठी श्रीनिवास पाटील नक्की मदत करतील अशी आशा अश्विनी पाटीलच्या कुटुंबीयांना आहे.एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 हजार पेक्षा जास्त जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. अनेक देशांमधले नागरिक चीनमध्ये अडकून पडले आहेत. अश्विनी पाटीलही त्यापैकी एक आहे. तिचा पती पोलंड येथे तिला सोडून निघून गेला आहे. अशात आता अश्विनीला सुटकेची अपेक्षा आहे ती भारत सरकारकडूनच. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही अश्विनीशी संवाद साधला आहे. तिला मदतीचं आश्वासन दिलं आहे असंही समजतं आहे.