राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळेच राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि अंशतः लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचसंदर्भात केंद्राने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलं असून, नाईट कर्फ्यू आणि नव्याने लागू केलेला लॉकडाउन परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर केंद्राने संबधित राज्यांमध्ये तज्ज्ञांची पथकं पाठवली होती. या पथकांनी राज्यातील कोरोना प्रसार नियंत्रित करण्याबरोबर काही उपाययोजनासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारला अहवालही पाठलेला होता. या अहवालानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे.
काय म्हटलं आहे केंद्राने
केंद्रीय पथकांनी विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर केंद्राने विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित घरं शोधणे व कंटेमेंट झोनवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर संक्रमण रोखण्यासाठी जर एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यास तिच्या संपर्कातील २० ते ३० जणांचा शोध घेण्याची गरज आहे, असं केंद्राने म्हटलं आहे. बस स्थानकं, झोपडपट्टी भाग, रेल्वे स्टेशन यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी राज्य सरकारने रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्सचा वापर करायला हवा. जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत आणि घरातच विलगीकरणात आहेत, त्याचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, असं केंद्राने राज्य सरकारला म्हटलं आहे.