७ एप्रिल २०२१,
ज्यांनी लोककला काळजापलीकडे जपली, जोपासली, ते तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी एबीपी माझा कट्ट्यावर पाहायला मिळाली. कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड, त्यांचं दु:ख या दोघांनी रसिकांसमोर मांडले.कोरोना आणी लाॅकडाऊनच्या काळात तमाशा फड मालकांची ही अवस्था झाली असेल तर इतर लोककलावंत कसे परिस्थितीला तोंड देत असतील याचा अंदाज बांधता येतो. मुळातच कला हेच पोट भरण्याचे साधन असल्याने कोरोना काळात जी अवस्था कामगार, हातावर पोट असणाऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे.
तमाशा मरणासन्न अवस्थेत पडला यालाही बरीच वर्षे झाली. नदीनाल्याच्या पाण्यात फेटे गुलाबी रंगवून, जत्रंतल्या तमाशाच्या तंबूत जाऊन ते फेटे उडवण्याचा काळ आता संपलाय. लोककलेला लोकांचाच पाठिंबा असेपर्यंतच ती जिवंत असते. आता लोककलांना लोकांचा पाठिंबा मिळत नाही अन राजाश्रयपण मिळत नाही.
भांडवली व्यवस्थेत जसं प्रत्येक वस्तू हि क्रय वस्तू बनते, कमोडीटी बनते तसा कलेचाही बाजार भरतो. मूळ तमाशात फिल्मी गाण्याचा तद्दन टाकाऊ अॉर्केस्ट्रा आला म्हणून तमाशा पाणचट झाला , लहाणपणापासून बऱ्याच फडाचे तमाशे बघितले आहेत त्यांची खंत खरी आहे, पण यात कलाकारांना संपूर्णतः दोष देणे चुकीचे वाटते. ते बिचारे समाजात जे विकले जाते तेच दाखवणार ना..! गणगवळण, बतावणी झाल्यानंतर मध्येच ऑर्केस्ट्रा दाखवणे ही त्यांची मजबूरी आहे, तरीही कुणी वग बघितल्याशिवाय जाऊ नये अशीच त्यांची दहादहा वेळा विनंती असे, कारण वग हेच खरे लोकनाट्य असते. त्यातच खरे प्रबोधन असते. वग लिहिणे हे काही साधे काम नसते, शाहिराचा तिथे खरा कस लागत असतो.
मूळ मुद्दा असा आहे की कलेचे भांडवलीकरण होऊन ती क्रय वस्तू बनवली गेली. समाजाची कलेची अभिरूची अशी या भांडवलीकरणाने, सांस्कृतिक आक्रमणाने त्यांना हवी तशी केलीय, हे आक्रमण चळवळीतल्या लोकांना आकलन होतंय की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रघुवीर खेडकर रडले यात खरं दुःख हे आहे की काहीतरी चिवटपणे जपलेलं निसटू लागलंय. “नटरंग” मधला गुणा कागलकर तमाशानं उद्ध्वस्त झाल्यावरही म्हणतो की, ” जे जिथे हरवलंय ते तिथंच शोधलं पाहिजे…” अन परत तमाशात स्वतःला झोकून देतो.
तरीही कलाकारांचा आत्मसन्मान जिवंत ठेवून समाजानेच त्यांना जपले पाहिजे असे वाटते कारण या कलेच्या मरणात आपली सांस्कृतिक हार लपलेली आहे..! कुठलाही कलावंत जगण्यावर निस्सीम प्रेम करणारा असतो. इतरांनाही कलेच्या माध्यमातून जगण्याची ऊर्मी तो देत असतो. लोककला हा मराठी रंगभूमीचा पाया आहे. तिला तडा न जाऊ देणं ही इथल्या सर्व रंगकर्मी ची जबाबदारी आहे. तशीच ती रसिक प्रेक्षकांची ही आहे…!
चला उभारी देऊयात …. लोककलावंत जगवूयात…!!
नोट:- ज्यांना शक्य असेल त्यांनी खालील माहीती वाचून मदत करावी…!
A/C no. 60384069036
IFC Code:- MAHB0000414
Name :- Raghuveer Khedkar , Magnla Bansode
Bank Name:- Bank of Maharashtra – Narayanganon
