कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद शहरात अंशतः लॉ़कडाउन घोषित केले आहे. यातच आता वेरुळ, अजिंठ्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ४ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी संयुक्तपणे दिले आहेत. तसेच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई केली आहे. औरंगाबाद शहरात गुरुवारपासून सायंकाळी ९ वाजेपासून सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. आता पर्यटनस्थळे, किल्ले, स्मारके, संग्रहालये बंद करण्याचे आदेश दिले असून दुकाने सुरू ठेवण्यासाठी चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील आरटी-पीसीआर चाचणी संचाची परिस्थिती लक्षात घेता प्रतिजन चाचण्या करण्यासही मुभा देण्यात आली असून तातडीने प्रतिजन चाचणी आणि त्यानंतर १५ दिवसांत आरटीपीसीआर चाचणी करुन घेण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. दुकानांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. प्रतिजन चाचणी तातडीने करुन न घेतल्यास टाळेबंदीच्या कालावधीमध्ये दुकाने पूर्णत: सील केले जातील. केवळ रॅपिड अॅन्टीजेन चाचणीने भागणार नाही तर या चाचणीनंतर आरटीपीआर चाचणी करुन घेणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे.