Monday, May 12, 2025
Homeताजी बातमीनागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहन चालवावे

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहन चालवावे

२१ जानेवारी २०२१,
‘वाहनचालकांनी स्वयंशिस्त बाळगणे, वाहतूक नियमांचे पालन करणे, बेदरकारपणे वाहन न चालविणे गरजेचे आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहन चालवावे,’ असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी पुणेकरांना केले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, पोलिस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजिलेल्या ३२व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ सोमवारी झाला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटन झाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, महामार्ग पोलिस अधीक्षक संजय जाधव, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे वाहतूक उपायुक्त सुधीर हिरेमठ, पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, अतुल आदे आदी उपस्थित होते. ‘रस्ता सुरक्षा अभियान एक महिन्याकरिता जरी असले, तरी संपूर्ण वर्ष त्याची अंमलबजावणी केली पाहिजे,’ असे गुप्ता म्हणाले. ‘अपघातांची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न करून अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. वाहतुकीच्या नियमांचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करून तरुण पिढीचे शिक्षणासह प्रबोधन करावे,’ असे जाधव म्हणाले.

‘रस्ते अपघातातील मृत्यू व जखमी व्यक्ती हा जागतिक स्तरावर आरोग्यविषयक प्रश्न म्हणून गंभीरपणे पाहिला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकास उद्दिष्ट २०३० अंतर्गत रस्ता सुरक्षेला तिसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य दिले आहे,’ अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.

‘सार्वजनिक वाहतूक सक्षम हवी’

“शहरीकरण वेगाने होत आहे. रस्त्यांची रुंदी तेवढीच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे अत्यावश्यक आहे. यामुळे नागरिक त्याचा जास्तीत जास्त वापर करतील आणि रस्त्यावर खासगी वाहनांची संख्या कमीत कमी राहील,’ असे मत विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments