पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरासह आसपासच्या भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार काल सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शहरातील बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. कोथरूड, सदाशिव पेठ, टिळक रोड, नवी पेठ, डेक्कन, गरवारे कॉलेज परिसर, नारायण पेठ, धानोरी, दांडेकर पूल, धानोरी, भैरवनगर, टिंगरे नगर, विश्रांतवाडी, लोहगाव या भागात पावसाच्या सरी बरसल्या. तसंच सारसबाग, सिंहगड रोड, सेनापती बापट रोड, एरंडवणे, औंध परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे.
होळीचा असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. मात्र ऐन होळी पेटवण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने सर्वांच्याच उत्साहावर विरजण पडलं आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. दिवसभर शहरातील वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र, आकाशात पावसाची चिन्हे मात्र दिसत नव्हती. सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले व मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.
अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली असून अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला होता.
दरम्यान, राज्यभरात देखील अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. बळीराजा सुलतानी संकटाशी झुंजत असताना आता अस्मानी संकटानेही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक हिरावून नेलं आहे. धुळे जिल्ह्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसला. मागील दोन दिवस अवकाळी पाऊस सुरु होता. गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. धुळ्यातील खोरी टिटने भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.