फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांकडून कारवाई
पुणे शहर प्रतिनिधी,
मातंग समाजाचे प्रेरणास्थान असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्यासह संपूर्ण मातंग समाजाचा वारंवार अवमान करून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करत जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक कुंडलिक कसबे , पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, २३ जून २०२६ रोजी कपिल के. सरोदे याने आपल्या फेसबुक अकाउंटवर “मांग हे हिंदू जातीचेदहशतवादी आहेत, त्यांना वेळीच ओळखा आणि बंदोबस्त करा,” अशा आशयाची पोस्ट प्रसारित केली. या पोस्टमुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच राजू थाटे, विकास गोंडे आणि कपिल के. सरोदे यांनी गेल्या सुमारे एका वर्षापासून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्याविषयी तसेच मातंग समाजाबाबत सातत्याने अवमानकारक लिखाण, पोस्ट आणि वक्तव्ये केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या माध्यमातून समाजात द्वेष, वैमनस्य आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधितांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे मातंग आणि बौद्ध समाजामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती.यापुढे कोणत्याही महापुरुषांचा अवमान केला तर त्यांच्यावर पण अशीच कारवाई केली जाईल अशी सकल मातंग समाज पुणे यांनी व्यक्त केले.
या तक्रारीची दखल घेत विश्रांतवाडी पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक भगवान गौतम शेंडगे यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे.


