३१ जानेवारी २०२०
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून झाली असून याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण झालं. यावेळी त्यांनी नव्या भारताला गती द्यायची असल्याचं सांगितलं. रामनाथ कोविंद यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक पाऊल असल्याचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं. जम्मू काश्मीर आणि लडाखचा विकास, तेथील संस्कृती आणि परंपरेचं रक्षण, पारदर्शी कारभार करणं माझ्या सरकारची प्राथमिकता आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“फाळणीनंतर महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं की, पाकिस्तानमधील हिंदू आणि शीख ज्यांना तेथे राहण्याची इच्छा नाही. ते भारतात येऊ शकतात. त्यांना सामान्य जीवन उपलब्ध करुन देणं भारत सरकारचं कर्तव्य आहे. महात्मा गांधींच्या विचारांचं समर्थन करत प्रत्येक वेळी राष्ट्रीय नेते आणि राजकीय पक्षांनी त्यांना पुढे नेलं आहे. आपल्या राष्ट्राची निर्मिती करणाऱ्यांच्या इच्छेचा सन्मान करणं आपलं दायित्व आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सुधारित नागरिकत्व कायदा तयार करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा पूर्ण केली आहे”, असं रामनाथ कोविंद यांनी यावेळी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, मी पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करतो. जागतिक संघटनेने याची दखल घेत त्यासंबंधी योग्य ते पाऊल उचलण्याचा मी आग्रह करतो.
केंद्र सरकारने केलेल्या कामांमुळे भारताने अनेक जागतिक रॅकिंगमध्ये उडी मारली असल्याचं सांगत अभिनंदन केलं. रामनाथ कोविंद यांनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या निर्णयानंतर देशवासियांना शांतता राखल्याबद्दल प्रशंसा केली