७ जून २०२१,
दररोज नवनवी शिखरे गाठणारे सेन्सेक्स आणि निफ्टीने सामान्यांवर चांगलंच गारुड घातल आहे. शेअर बाजार म्हणजे सट्टा असा समज खोटा ठरवेल, अशी आकडेवारी समोर आली आहे. करोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर भांडवली बाजाराला जोरदार तडाखे बसले असले तरी त्यानंतर भांडवली बाजारात नव्याने नशीब आजमावणाऱ्यांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. एप्रिल २०२० पासून दरमहा सरासरी १३ लाख डिमॅट खाती सुरु करण्यात आली आहे.
मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ३१ मे २०२१ अखेर देशभरातील किरकोळ गुंतवणूकदारांचा आकडा ६ कोटी ९७ लाखांवर पोहोचला आहे. एप्रिल २०२० पासून प्रत्येक महिन्याला सरासरी १३ लाख नवीन डिमॅट खाती सुरु करण्यात आल्याचे बीएसईने म्हटलं आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला महामारी घोषीत केल्यानंतर सेन्सेक्समध्ये प्रचंड घसरण झाली होती. निर्देशांक तब्बल ३५ टक्के घसरला होता. मात्र जूनपासून शेअर बाजाराने पुन्हा तेजीची वाट धरली ती आजतागायत सुरु आहे. त्यामुळे शेअर बाजाराविषयीचे सर्वसामान्यामधील कुतूहल वाढले असल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे.मागील वर्षभरात सुरु झालेल्या नवीन डिमॅट खात्यांपैकी ४० टक्के डिमॅट खाती बीएसईच्या ब्रोकर्सने सुरु केली आहेत. ३१ मे २०२१ च्या एकूण गुंतवणूकदारांपैकी एक चतुर्थांश ही महाराष्ट्रातून सुरू झाली आहेत. गुजरातमधून ८५ लाख ९० हजार डिमॅट खाती सुरु झाली आहेत.
तिसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश असून या राज्यातून आतापर्यंत ५२ लाख ३० हजार डिमॅट खाती सुरु करण्यात आली आहेत. तामिळनाडूमधून ४२ लाख ३० हजार आणि कर्नाटकामधून ४२ लाख २० हजार खाती सुरु करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान आणि निकोबारमधून ९७०० डिमॅट खाती आणि लक्षद्वीपमधून ४८० डिमॅट खाती सुरु करण्यात आली आहेत.