मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित केलं आहे. पण उशिराने करण्यात आलेल्या कारवाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन, त्याशिवाय सरकार हलत नाही,” असं म्हणत या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली आहे. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून भूमिका मांडली आहे.
“अवघ्या २८ वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का? दीपाली चव्हाण प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्यांची तत्काळ नियुक्ती करा. जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा,” अशा मागण्या फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत.