मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अॅड. जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. भाजपाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “जे जे चुकेल त्याला शासन आहे, तोपर्यंत लोकशाही सदृढ होणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनात शंक होती. पवारांच्या घरी बैठक आहे, काय निर्णय घेतील? धनंजय मुंडेंच्या वेळीही सहा तास पवारांच्या घरी बैठक चालली. पण शेवटी धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत असा निर्णय झाला”.
“परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतरदेखील शरद पवारांकडे बैठक झाली. त्यावेळी राजीनामा न घेण्याचा निर्णय झाला. शरद पवारांनी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पण खोटं पडल्यानंतर त्यांनी बोलणंच बंद केलं. पण शरद पवार निर्णय घेत नाहीत तोवर राजीनामा झाला नसता. त्यामुळे मी समाधान करतो. शरद पवारांनी संवेदनशीलतेने सीबीआयचा तपास लागल्यावर मंत्रीपदावर राहता येत नाही याची जाणीव ठेवून निर्णय घेतला आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.