२३ नोव्हेंबर २०२०,
दिल्लीसह अनेक राज्यात करोनाची दुसरी लाट आली आहे. दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होत चालली आहे. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे.
राज्यात दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दिवाळीनंतर करोना रुग्णांचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळं राज्य सरकारने वेळीच पावलं उचलत महाराष्ट्र -दिल्ली प्रवासावर निर्बंध आणले आहेत. महाराष्ट्राच्या सीमांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहेत. तसंच, दिल्ली, गोवा, राजस्थान या राज्यातून ट्रेन किंवा विमानानं येणाऱ्या प्रवाशांकडे करोनाचे चाचणीचे अहवाल असणं अनिवार्य असणार आहे. प्रवाशांनी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे.
काय आहे ही SOP
– दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे. म्हणजे त्यांना करोना टेस्ट बंधनकारक आहे.
– महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी ही करोना चाचणी करावी लागेल.
– ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने करोना चाचणी करावी लागेल.
– चाचणीनंतर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती त्या प्रवाशाकडून घेतली जाईल.
– ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.