सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. ज्या दिवशी सत्ता येते, त्या दिवसापासून सत्ता जाते. मला म्हणतात तुमच्या सभेला गर्दी होते. पण, मते मिळत नाहीत. पण, २००९ मध्ये १३ आमदार काय मटक्याच्या आकड्यावर निवडून आले होते काय, लोकसभेला उमेदवारांना लाखावर मते पडली होते. पण, प्रत्येकाचा काही काळ असतो. सुरुवातीला भाजपचे किती खासदार होते. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्याही मोठ्या सभा होत होत्या. पण, मते किती पडत होती. त्यावेळी काँग्रेसशिवाय काय पर्याय होता. त्याप्रमाणे प्रत्येकाचा काही काळ असतो, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्ड आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदेत पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांचा गौरव राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आकुर्डीतील ग.दि. माडगूळकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात लोकशाही चॅनेलचे कमलेश सुतार , अमित मोडक , संदीप महाजन,आशिष देशमुख ,विनाश खंदारे , महेश तिवारी , अश्विनी सातव – डोके, गोविद वाकडे यांचा सत्कार करण्यात आला तर मदार फणसे , संजय आवटे यांनी पत्रकारांवरील हल्ला या चर्चा सत्रात भाग घेतला यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मनसेचे नेते अनिल शिदोरे, अमित ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, शत्रुघ्न काटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आदी उपस्थित होते.
मोबाईलमुळे अनेकजण व्यक्त व्हायला लागले आहेत. राजकीय पक्षांनी लोक पाळले आहेत. त्यावर कशाला प्रतिक्रिया देता. पत्रकारांनी महाराष्ट्र हितावर निर्भीडपणे बोलावे, लिहावे, पत्रकारितेवरील हल्ले निषेधार्थ आहेत. ट्रोलिंगकडे लक्ष देवू नका असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
आज अनेक पत्रकार वाया गेले आहेत. महत्वाच्या हुद्यावर बसले आहेत. पत्रकार मंत्र्यांकडे कामाला लागले आहेत. पूर्वी लपूनछपून करत होते. आता उघडपणे काम करत आहेत. हे लेबल लावलेले पत्रकार परिषदेत येतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात. हे काय म्हटला आणि तो काय म्हटला असेच प्रश्न विचारत आहेत. राजकारणाचा स्तर, भाषा बदलली आहे.
तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात. तुम्ही नाही दाखविल्यावर कुठे बोलतील असा सवाल करत ठाकरे म्हणाले, पत्रकारांवरील हल्ले पण आमच्या हल्यावरील काय? महाराष्ट्रातील पत्रकारिता आजही जीवंत आहे. मीही पत्रकारितेत काम केले आहे. मार्मिकमध्ये ब्लॉक लावण्याचे काम केले. तिथपासून ते आतापर्यंतच्या वृत्तपत्राच्या छपाई पर्यंतचा प्रवास पाहिला आहे. पत्रकारिता पाहिली नाही. तर,अनुभवली आहे. पत्रकारितेतून राजकारणात आलो. आताची पत्रकारिता बघत आहे.
अजित पवार सत्तेत गेले याचा पत्रकारांना राग यायला पाहिजे. महाराष्ट्रात काय चालू आहे. सहा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर कोट्यवधी रुपयांचे भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आणि सहा दिवसांनी ते सत्तेत सहभागी होतात. याचा पत्रकारांना राग येत नाही. त्यावर केवळ हसतात आणि सोडुन देतात. हा घरातून निघाला आणि येथे पोहोचला या काय बातम्या आहेत का, निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले.