५ फेब्रुवारी २०२१,
भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर इंग्लंडच्या संघाने ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारत खेळावर पूर्ण वर्चस्व राखलं. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक (१२८) ठोकलं, पण सिबली शेवटच्या सत्रात ८७ धावांवर पायचीत झाला आणि दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. जसप्रीत बुमराहने २ तर अश्विनने १ बळी टिपला.
जवळपास वर्षभराने भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला शुक्रवारी सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरूवात केली. काही वेळाने अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करताना रॉरी बर्न्स झेलबाद झाला. त्याने ६० चेंडूत ३३ धावा केल्या.
त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्स धावांचं खातंही उघडू शकला नाही. पाचव्या चेंडूवर त्याला बुमराहने पायचीत केले. पण त्यानंतर पहिलं सत्र आणि दुसरं संपूर्ण सत्र सिबली-रूट जोडीने खेळून काढलं. रूटने दमदार शतक झळकावलं तर सिबलीने आपली लय कायम राखत त्याला साथ दिली. रूट-सिबलीने २०० धावांची भागीदारी केली. परंतु दिवसाचा खेळ संपण्यासाठी काहीच चेंडू शिल्लक असताना सिबली १२ चौकारांसह ८७ धावांवर पायचीत झाला आणि खेळ थांबवण्यात आला. जो रूट १४ चौकार आणि १ षटकारासह १२८ धावांवर खेळत आहे.