“सध्या आपल्या अवतीभवती सर्वकाही आलबेल आहे असंच दाखवलं जातंय”
सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी व्यक्त केलं. ते बुधवारी (१५ डिसेंबर) पत्रकार सुधाकर रेड्डी लिखित ‘ब्लड सँडर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांची पहिली नोकरी ही पत्रकारितेची असल्याचं नमूद केलं आणि त्यांच्या तरूणपणातील वर्तमानपत्रात वेगवेगळे घोटाळे उघड करणाऱ्या रिपोर्टिंगविषयी आपली मत मांडली.
सरन्यायाधीश रमण म्हणाले, “ज्याची पहिली नोकरी पत्रकाराची होती असा व्यक्ती म्हणून मी आजच्या दिवशी माध्यमांवर काही विचार मांडण्याचं स्वातंत्र्य घेणार आहे. भूतकाळात शोध पत्रकारितेतून वेगवेगळे घोटाळे उघड व्हायचे, गैरव्यवहार समोर यायचे आणि त्यामुळे देशभरात पडसाद पडलेले आम्ही पाहिले आहेत. मात्र, सध्याच्या काळात एखाद दुसरा अपवाद सोडता अशा ताकदीची शोध पत्रकारिता पाहायला मिळत नाही. भारतात शोध पत्रकारिता नामशेष होत असल्याचं दिसत आहे.”
“आम्ही जेव्हा तरूण होतो तेव्हा आम्हाला वर्तमानपत्रांमध्ये घोटाळे समोर आणलेले वाचण्याची उत्सुकता असायची. तेव्हा वर्तमानपत्रांनी आम्हाला कधीही निराश केलं नाही. मात्र, सध्या आपल्या अवतीभवती सर्वकाही आलबेल आहे असंच दाखवलं जातंय. त्यामुळे या विषयावर तुम्ही स्वतःच तुमची मतं बनवावी असं सांगून मी याबाबतचा निर्णय तुमच्यावर सोपवतो,” असंही सरन्यायाधीश रमण यांनी नमूद केलं. सरन्यायाधीश रमण यांनी आपल्या करियरची सुरुवात तेलगू वृत्तपत्र ईनाडूमधून पत्रकार म्हणून केली होती.
सरन्यायाधीश रमण हे मूळचे आंध्र प्रदेशमधील आहेत. ते आणि या पुस्तकाचे लेखक सुधाकर रेड्डी आंध्रमधील अगदी जवळजवळच्या गावचे रहिवासी होते. यावेळी रमण यांनी आपल्या मूळ गावाच्या आठवणींवर बोलताना गावाकडे जाण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. तसेच लवकरच त्याबाबत नियोजन करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.