भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली आहे. ‘तीन पायांचे हे सरकार आहे आणि तिन्ही चाके पंक्चर आहेत. या सरकारच्या पराभवाची सुरुवात पुणे महापालिकेतील भाजपच्या विजयाने होईल. पुण्यात आपल्याला १२० नाही तर त्यापेक्षा जास्त जागा मिळतील,’ असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला आहे.
अमित शहा हे पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. पुणे महापालिकेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमीपूजन केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित भाजप बूथ कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
या कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पण, शिवसेना असं समजत आहे की सरकार माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्ब्येत ठीक नाही. त्यांची प्रकृती ठीक होवो, असंही शहा म्हणाले.
आज प्रत्येक जिल्ह्यात २ प्रयोगशाळा आहे
- १३० कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे काम पूर्ण होत आहे. जगात कोठेही असं काम झालेलं नाही
- महाराष्ट्र सरकार कोठे आहे, असं लोक शोधत होते. तेव्हा मोदी यांनी २० वेळा लोकांशी संपर्क साधला
- हे सरकार डीलर, ब्रोकरवाले सरकार आहे
- मोदी यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी केल्या. मात्र यांनी दारू स्वस्त केली.
- हे वसुलीचे सरकार आहे
- भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. पण आम्ही घाबरणार नाही
- पुण्याने विजयाची सुरुवात करावी, महापालिका निवडणुकीच्या निकालाचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसतील