राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर आता मावळ लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीही बदलू शकते. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर मावळमधून पुन्हा पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेले मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.
लोकसभा मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाली. या पुनर्रचनेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करत मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. शहरी, ग्रामीण भागाचा या मतदारसंघात समावेश आहे. मावळमधून २०१९ मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, पार्थ यांचा तब्बल दोन लाख १५ हजार ९१३ मतांनी दारुण पराभव झाला. शरद पवार यांचा पार्थ यांच्या उमेदवारीला विरोध असतानाही उमेदवारी दिली होती. पार्थ यांच्या भवितव्याची त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांना चिंता असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या आग्रहामुळेच २०१९ मध्ये उमेदवारी दिली होती, अशीही चर्चा आहे.
शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पवार घराण्यातील पहिल्या सदस्याचा पराभव केला होता. बारणे आणि अजित पवार यांचे राजकीय वैर सुरुवातीपासूनच आहे. २०१९ नंतर त्यामध्ये वाढ झाली. आता राज्यातील समीकरणे बदलली आहेत. अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद येण्याची दाट शक्यता आहे. मावळमध्ये येत असलेल्या पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह बहुतांश पदाधिकारी पवार यांच्यासोबत आहेत. रायगडमध्ये राजकीय ताकद असलेले सुनील तटकरे हे अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे मावळच्या जागेवर पवार गटाचा प्रबळ दावा राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर आता पार्थ पवार राजकारणार सक्रिय झाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना श्रीरंग बारणे यांनी महायुतीचा उमेदवार मीच असल्याचा दावा केला आहे. महायुतीतले सगळ्याच पक्षांना एकत्र निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. मात्र काहीही झालं तरीही मीच उमेदवार राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील बदलेल्या परिस्थितीनंतर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठीशी आहेत. आता या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. भाजपकडे असणाऱ्या चिंचवड विधानसभेवर नाना काटे यांनी दावा ठोकला आहे तर पिंपरी पालिका पुन्हा राष्ट्रवादी काबीज करेल, असं ते ठामपणे सांगत आहेत. दुसरीकडे पार्थ पवारांनी लढविलेल्या मावळ लोकसभेवर आधीच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं स्थानिक पातळीवर जुळवून घेताना तिन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आणि तिढा निर्माण होणार हे स्पष्ट आहे.