आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. अशातच शिवसेना भवनाजवळ त्यांच्या गाडीला एका बाईकस्वाराने धडक दिली.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा १ जुलैला मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात निघणाऱ्या मोर्चासाठी सध्या सेना भवन येथे बैठकींचे सत्र चालू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचा बैठका दादरच्या शिवसेना भवनात होत आहेत. आज दुपारच्या सुमारास आदित्य ठाकरे बैठकींसाठी शिवसेना भवन येथे येत असताना त्यांच्या गाडीला दुचाकीने धडक दिली. हा अपघात मोठा नसला तरी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारा आहे.
गेल्या काही दिवसात आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये कपात झालेली माहिती प्रसार माध्यमांमध्ये आली होती त्यानंतर गृह खात्याकडून ठाकरे कुटुंबीयांचा सुरक्षेमध्ये कपात करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले होते. सध्या आदित्य ठाकरे यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा ही झेड दर्जाची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचे एक वाहन असते त्यात एक अधिकारी आणि चार कर्मचारी असल्याची माहिती आहे. ठाकरे कुटुंबीयांना अशा प्रकारची सुरक्षा देणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करत आहेत.
मातोश्रीसह ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली होती परंतु गृह खात्याकडून आलेल्या माहितीनुसार ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा जशास तशी असल्याची माहिती देण्यात आली. ठाकरे कुटुंबीयांची सुरक्षा कायम ठेवली असते तर मातोश्री बाहेरील SRPF रक्षकांना देखील हटवण्यात आले आहे. मातोश्री परिसरात असणारी मुंबई पोलिसांची सुरक्षा देखील काढण्यात आलेली आहे या अपघाता नंतर आदित्य ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा आणि वाहन सरकार देणार का, असा सवाल समस्त शिवसैनिकांना पडला आहे.