प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत शेतकरी आंदोलकाच्या गटाचं नेतृत्व करणारा म्होरक्या दीप सिद्धूला नुकतंच अटक करण्यात आलं आहे. त्याने आपल्या चौकशीत लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना कशी आखली होती, याचा खुलासा केला आहे. पण तो कोणत्याही कट्टरपंथी संघटनेसाठी काम करत नाही, असं त्याने पोलीस चौकशीत स्पष्ट केलं आहे.
काय सांगितले दीप सिद्धूने
त्याने सांगितलं की, शेतकऱ्यांप्रती भावुक होऊन या आंदोलनात सहभाग घेतला होता. लॉकडाऊनमध्ये आणि नंतरच्या काळात हाताला काही काम नव्हतं. त्याचवेळी ऑगस्टमध्ये पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तोही या आंदोलनाकडे आकर्षित झाला आहे. दीप सिद्धूने पुढे सांगितलं की, तो ज्यावेळी आंदोलनाच्या स्थळी जायचा, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात युवक यायचे. याचा फायदा घेवून त्याने आपल्या काही समर्थकांच्या मदतीने पोलिसांनी आखून दिलेला नियोजीत मार्ग तोडण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी त्याने शेतकरी आंदोलनातील स्वयंसेवकांचे काही जॅकेट चोरण्यासही सांगितलं होतं. याशिवाय तो 28 नोव्हेंबरला दिल्लीत झालेल्या एका रॅलीतही सहभागी झाला होता.
दीप सिद्धूने प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधीच लाल किल्ला आणि इंडिया गेटपर्यंत जाण्याचा प्लॅन केला होता. पण 26 जानेवारी रोजी तो केवळ लाल किल्ल्यापर्यंतच जावू शकला. फरार आरोपी जुगराज सिंह याला खास धार्मिक ध्वज फडकवण्यासाठीच आणण्यात आलं होतं असंही पोलीस चौकशीत दीप सिद्धू याने सांगितलं आहे.