९ ऑगस्ट २०२१,
बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता अनुपम श्याम यांचं काल ८ ऑगस्ट रोजी निधन झालं. लाइफ लाइन इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होत होता. यासंबंधी उपचारांसाठी त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. मल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे त्यांचं निधन झालं.
अशोक पंडित यांनी अनुपम यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘दिग्गज अभिनेता अनुपम श्याम यांचं मल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे निधन झालं. हे सिनेसृष्टी आणि टीव्ही जगताचं मोठं नुकसान आहे.’ गेल्या वर्षी, अनुपम किडनीच्या समस्येमुळे इस्पितळात दाखल झाले होते. त्यांच्या भावाने इस्पितळाचे बिल भरण्यासाठी लोकांकडून आर्थिक मदतही मागितली होती. प्रकृती सुधारल्यानंतर अभिनेत्याला दररोज डायलिसिससाठी जावे लागायचे. यावर्षी ‘मन की आवाज प्रतिज्ञी’ मालिकेचा दुसरा सीझन सुरू झाला, तेव्हा अनुपम यांनी पुन्हा काम करायला सुरुवात केली. शूट संपल्यानंतर ते आठवड्यातून तीनदा डायलिसिससाठी जायचे.
तब्येत ठीक नसतानाही त्यांनी सज्जन सिंहची भूमिका साकारण्यासाठी हो का याचं कारण अनुपम यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ते म्हणाले की, प्रेक्षकांना हे पात्र खूप आवडतं आणि चाहत्यांना त्यांना निराश करायचं नव्हतं म्हणून अनुपम यांनी ही भूमिका स्वीकारली होती. ते म्हणाले होते की, ‘मृत्युशी युद्ध सुरू होतं. तिथे जिंकून आलो. आता प्रतिज्ञा मालिकेच्या माध्यमातून मला पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे.’


