मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.मॉरिस नोरोन्हा या स्थानिक गुंड आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने हा गोळीबार केला. त्यानंतर नोरोन्हाने गोळी झाडून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारिख, रोहित साहू आणि मॉरिसच्या अंगरक्षकाला ताब्यात घेतलंय. या प्रकरणामागचं नेमकं कारण काय, दिसतंय त्यापेक्षा इतर काही कारणं असू शकतात का याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घोसाळकर आणि नोरोन्हा गुरूवारी संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्यानं पिस्तुल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
मॉरिस नोरोन्हा हा दहिसर-बोरिवली परिसरात राहतो. या भागात तो मॉरिस भाई म्हणून परिचीत होता. तो अनेकवेळा परदेश दौरेही करत होता. नुकतंच तो अमेरिकेतील लॉस एंजल्सवरून आला होता. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्याने महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ज्या भागाचं नेतृत्व अभिषेक घोसाळकर करतात, त्याच भागातून मॉरिस निवडणुकीची तयारी करत होता. मात्र घोसाळकर त्याला विरोधक ठरत होते.
दीड वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसचं कडाक्याचं भांडण झालं होतं. मॉरिसवर बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. त्या प्रकरणात मॉरिसला 5 महिने तुरुंगात जावं लागलं होते. मात्र बलात्कारासारख्या खटल्यात अभिषेक घोसाळकरांनीच अडकवल्याचा राग मॉरिसच्या मनात होता. त्याचा बदला घेण्याची भावना नेहमीच त्याच्या मनात होती, हे मॉरिसच्या पत्नीच्या जबाबावरुन सिद्ध होतंय. मॉरिस नेहमी अभिषेक घोसाळकरांना सोडणार नाही हेच घरात बोलत असायचा असा जबाब मॉरिसच्या पत्नीने आज पोलिसांना दिला.
या बदल्याची भावना मनात ठेवून मॉरिस संधी शोधत होता. अगदी थंड डोक्याने त्याने घोसाळकरांच्या हत्येचा प्लॅन आखला.
‘You can’t defeat a man, who doesn’t care about pain, loss, disrespect, Heart Break and rejection’. मॉरिस नोरान्हानं 29 जानेवारीला केलेली ही पोस्ट. अशा पोस्टवरुन कुणाचीही मानसिक स्थिती सांगणं जरा कठीण आहे. पण गुरूवारी त्यानं जे केलं त्याचा जणू इशाराच या पोस्टमधून मॉरिसनं दिला होता. कारण जेव्हा त्यांनं अभिषेक घोसाळकरवर गोळ्या झाडल्या, त्याच्या काही मिनिटं आधी फेसबुक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकरांच्याच बाजूला बसून त्यानं एक डायलॉग मारला होता.
मॉरिसच्या पत्नीच्या जबाबातून प्राथमिक कारण समोर
फेसबुक लाईव्ह करताना दोघेही हसत होतो, जनहिताच्या गोष्टी फेसबुक लाईव्हमधून करत होते. नव्या सुरुवातीचीही चर्चा दोघांनी केली. मग मॉरिसनं त्याला का मारलं असा अनेकांना प्रश्न पडला. त्याचं प्राथमिक उत्तर हे मॉरिसच्या पत्नीच्या जबाबातून समोर येतंय.
क्राईम ब्रांच युनिट 11नं मॉरिसच्या बायकोचा जबाब नोंदवला. त्यानुसार मॉरिसवर बलात्कारासह विनयभंग असे दोन गुन्हे होते. दोन्ही गुन्ह्यांमुळे मॉरिस येरवडा तुरुंगात जवळपास 5 महिने बंद होता. अटकेमागे अभिषेक घोसाळकर यांचा हात असल्याचा मॉरिसचा समज होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही मॉरिसाच्या मनात राग कायम होता. ‘मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच’ असं अनेकदा बालायचा.
मॉरिसच्या पत्नीचा जबाब आज पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. असं असलं तरी प्राथमिक चौकशीतून हत्येचं प्राथमिक कारण स्पष्ट होतंय.
बलात्कार आणि विनयभंगाची केस, घोसाळकरांवर राग
खरंतर, मॉरिसवर 2014 साली गंभीर आरोप सुरु झाले. मात्र, 2022 साली त्या प्रकरणात त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी झाली. 80 लाखांची फसवणूक, 48 वर्षीय महिलेचा बलात्कार, धमकी आणि ब्लॅकमेलिंग अशा गुन्हामध्ये त्याला अटक झाली.
दहिसरमध्ये घोसाळकरांचं वर्चस्व आणि मॉरिसची राजकीय महत्त्वाकांक्षा
मॉरिस तुरुगांतून बाहेर आल्यानंतर राजकीय मंचांवर दिसू लागला. कोरोना काळात त्यांनं सामाजिक कामांमध्येही पुढाकार घेतला. त्यासाठी त्याला कोरोना योद्धा म्हणून सामाजिक पुरस्कारही मिळला. पुढे हाच मॉरिस नोरोन्हाचा मॉरिस भाई झाला. आणि मग काय, सर्वपक्षांच्या नेत्यांसोबत त्याचे फोटो सुरु झाले. तेच फोटो विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी व्हायरल केले.
कुणी मॉरिसचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो पोस्ट केला. तर थेट अभिषेक घोसाळकरांसोबतचाच फोटो व्हायरल केला. दुसरीकडे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांपासून राहुल गांधींच्या भारत जोडोपर्यंत, प्रत्येक राजकीय पक्षासाठी मॉरिसचे बॅनर्स लागयाचे.
याच सगळ्यातून मॉरिसनं दहिसरमध्ये राजकीय महत्वाकांक्षा दाखवून दिल्या होत्या आणि त्याच दहिसरमध्ये घोसाळकरांचं वर्चस्व होतं. मॉरिसनं मधल्या काळात ठाकरेंच्या पक्षात जाण्याची तयारीही केली होती. त्यातूनच अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमधील राजकीय स्पर्धा सुरु झाली. पुढे प्रभागातला संघर्ष आणि त्याला गुन्हेगारी मानसिकतेची जोड, शिवाय तुरुगांत जावं लागल्याचा द्वेष. याच सगळ्यातून दहिसरमधील गोळीबाराची घटना घडल्याची शक्यता सर्वाधिक आहे.
- गोळीबार प्रकरणाची क्रोनोलॉजी आणि पोलिसांचा संशय
- मॉरिसने कट रचून घोसाळकरांची हत्या केली.
- मॉरिसविरोधात बलात्कार, विनयभंगप्रकरणी गुन्हे दाखल होते.
- बलात्कारप्रकरणी मॉरिसला अटकही झाली होती. काही महिने तो येरवडा कारागृहात होता.
- दोन्ही गुन्ह्यात घोसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा मॉरिसला संशय होता. यातूनच त्यांच्यातील वैर वाढलं आणि कट रचला.
- येरवड्यातून बाहेर पडल्यानंतर काटा काढण्यासाठी घोसाळकरांसोबत जवळीक साधली.
- घोसाळकरांच्या वाढदिवसाला मॉरिसने बॅनरबाजीही केली होती.
- गुरुवारी साडी वाटपानिमित्त मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना आपल्या कार्यालयात बोलावलं.
- त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं आणि ते संपत असताना गोळ्या घालून घोसाळकरांची हत्या केली.
- घोसाळकरांच्या हत्येनंतर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.