१० जुलै २०२१,
महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. चौकशीनंतर तीन महिन्यात अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीतील फोन टॅपिंग प्रकरणाची ही चौकशी आहे.
फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी करणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दिले होते
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात आज फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. 2016-17 मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.
अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा घणाघातही नाना पटोलेंनी सभागृहात केला होता.


