उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात ‘ब्लॅक मनी’चा वापर करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाचही राज्यांतून आतापर्यंत रोकड व अन्य मिळून १ हजार कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
उत्तराखंड, गोवा आणि पंजाब या तीन राज्यांत मतदान पार पडले आहे तर उत्तर प्रदेशात मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. उत्तर प्रदेशात मतदानाचे अजून तीन टप्पे बाकी आहेत तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या पाचही राज्यांत आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईबाबतचा तपशील देण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल १ हजार १८ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २०१७च्या निवडणुकीची तुलना करता ही रक्कम तीनपट अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
आयोगाने दिलेली आकडेवारी पाहता, पंजाबमध्ये सर्वात जास्त मुद्देमाल जप्त केला गेला आहे. पंजाबमध्ये ३३.७९ कोटी इतकी रोकड, ३६.७९ लाख रुपये किंमतीची जवळपास ६० लाख लीटर दारू, १४३ कोटींचे ड्रग्ज असा ५१०.९१ कोटींचा मुद्देमाल विविध छापेमारीत जप्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९१.३० कोटी इतकी रोकड, सुमारे ५४ कोटी रुपयांची २० लाख लीटर दारू व अन्य साहित्य असे मिळून ३०७.९२ कोटी रुपयांचा मुद्देमाल छापेमारीत सापडला आहे. मणिपूरमध्ये रोकड, दारू व अन्य मिळून १६७.८३ कोटींचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे तर उत्तराखंडमध्ये १८.८१ कोटी रुपयांचा मुद्देमाल पकडला गेला आहे. गोव्यात ६.६६ कोटी इतकी रोकड जप्त करण्यात आली आहे तर ३.५७ कोटी रुपयांचा ९५ हजार ४४६ लीटर मद्यसाठा व १.२८ कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले गेले आहे.


