१३ डिसेंबर
बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर, महामार्ग वाहतूक व्यवस्थापन व्यवस्था (हायवेज ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम – एचटीएमएस) राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून त्या अंतर्गत संपूर्ण महामार्गावर दर चार मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. परिणामी, वाहतूक शिस्त मोडणाऱ्या वाहनचालकांवर थेट कारवाई करता येईल.
द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाने महामार्गावरील वेगमर्यादा कमी केली आहे. पूर्वी ताशी १२० किलोमीटर इतकी असलेली वेगमर्यादा १८ नोव्हेंबरपासून ताशी १०० किलोमीटर करण्यात आली आहे. महामार्गावर चालकासह आठ प्रवासी क्षमतेच्या वाहनांचा वेग ताशी १०० किलोमीटर, नऊपेक्षा अधिक क्षमतेच्या प्रवासी वाहनांचा वेग ताशी ८० किलोमीटर असा करण्यात आला आहे.
या वेगमर्यादेत वाहन चालवणे वाहनधारकांना बंधनकारक असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी स्पीडगन आणि काही ठिकाणी उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येत आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीमुळे कारवाईला मर्यादा येत आहेत. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून केल्या जाणाऱ्या कारवाईलाही मर्यादा आहेत.
या पाश्र्वभूमीवर महामंडळाने एचटीएमएस राबवण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्याला मान्यता मिळाली असून या व्यवस्थेअंतर्गत द्रुतगती महामार्गावर ९४ किलोमीटर अंतरावर दर चार मीटर अंतराने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.त्यामुळे वेगमर्यादा, मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या वाहनधारकांवर थेट कारवाई करून दंड आकारणे शक्य होईल. संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता महामंडळाकडून व्यक्त करण्यात आली.