३ फेब्रुवारी २०२०
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी “सीएए कायदा लागू न करायला बापाचं राज्य आहे का?,” असं शेलार असं वक्तव्य होते. या विधानाचा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला. “आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही. महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे,” असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी शेलार यांना दिलं आहे.
महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. एनआरसी लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूपच अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मी असे होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सीएए कायदा लागू न करायला बापाचं राज्य आहे का?, असं शेलार म्हणाले. शेलार यांच्या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. “उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असं जाहीर निवेदन करणं आशिष शेलार यांना शोभत नाही. आणि होय मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही,” असे देखील ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ” संसदेत पारित कायदा मान्य करणे. देशाचे संविधान मान्य करणे ही महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ख्याती आहे. संसदेचे कायदे आणि संविधान मान्य नाही का? याचं उत्तर राष्ट्रवादीनं द्यावं. जितेंद्र आव्हाड तुम्हाला प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंकडे रोख नाही,” असं शेलार म्हणाले आहेत.