1 फेब्रुवारीराेजी सादर झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये देशातील केवळ एक टक्का लोकांचाच विचार करण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्याचबरोबर बजेटसह चीन आणि शेतकरी आंदोलन या विषयांवरही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण भाष्य केलं.
राहुल गांधी म्हणाले, “मला बजेटकडून अपेक्षा होती की सरकार देशातील ९९ टक्के लोकसंख्येच्या पाठीशी उभं असेल. मात्र, हे बजेट केवळ एक टक्का लोकांसाठीच आहे. सरकारनं लहान आणि मध्यम उद्योग, कामगारा, शेतकरी आणि संरक्षण खात्याचा निधी काढून तो पाच-दहा लोकांच्या खिशात टाकला आहे”
“तुम्ही सांगितलं होतं की, खासगीकरण हे सर्वसाधारण लोकांच्या फायद्याचं असेल. त्यानुसार या लोकांच्या हातात पैसा ठेवणं गरजेचं होतं. कारण जर आपल्याला अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करायची असेल तर ती केवळ उपभोग्य बाजूनेच सुरु होईल, पुरवठा बाजूने ते शक्य नाही,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दिल्लीला चहुबाजूंनी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. या लोकांनी आपल्याला जगवलं आहे, मग तरीही दिल्ली एखाद्या तटबंदीमध्ये का रुपांतरीत झाली आहे? आपण शेतकऱ्यांना धमकावत, मारत का आहोत? त्यांचा जीव का घेत आहोत? सरकार त्यांच्याशी चर्चा का करत नाही? त्यांच्या समस्या का सोडवत नाही? ही समस्या देशासाठीही चांगली नाही, अशा शब्दांत राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं.